|| निषेकाधानजन्मात:
||
दिवाळी अंका साठी खरे तर
एखादा विषय घेवून कुंडल्यासह विवेचन करावे असा विचार होता. पण दरम्यान कोणत्याही
ज्योतिष विषयक ग्रुप वर अधून मधून चर्चिला जाणारा विषय म्हणजे जन्मवेळ. जन्मवेळ
म्हणून कोणती वेळ घ्यावी? यावर काही लिहावे असे वाटले. कोणत्याही पद्धतीने जन्म कुंडली
ज्या शिवाय बनवता येत नाही ते म्हणजे जन्म टिपण. कुंडली फलिताची इमारत यावरच. परत
परत हा विषय चर्चिला जाण्याचे कारण म्हणजे जन्मवेळेवर घेतला जाणारा संशय, खरे तर देशा
साठी एक प्रमाणवेळ (standard time) आल्या पासून हा वाद
मिटायला हवा होता. अर्ध्या शतका पासून खेडोपाडीही बऱ्या पैकी घडाळ्याचा प्रमाणवेळे
नुसार वापर चालू झाला आहे. आता तर मोबाईल मुळे खुप सोपे झाले. आता कोंबड आरवल
तेव्हा, फटफटले होते, सूर्य उगवायच्या टायमाला, डोक्यावर आला तेव्हा, गुर परतायचा
टायम झालता तेव्हा, दिवे लागणीला, रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात इ.इ. अश्या जन्मवेळा
येत नाहीत. घड्याळे मागे पुढे लागलेले असणे याही गोष्टीत आता फारसा मोठा फरक होत
नाहीत. तरीही हा विषय चर्चिला जातो. एक तर रुग्णालय कर्मचारी, डॉंक्टर यांची
अनास्था हे कारण सांगितले जाते व दुसरे म्हणजे ज्योतिषा मध्ये आलेल्या नवीन पद्धती
ज्याना सेकंदा पर्यंत जन्मवेळ हवी असते जी प्रत्यक्षात नोंदविणे महाकठीण. त्यामुळे
जन्मवेळ शुद्धीकरणाने अशी वेळ काढून ती योग्य असल्याचे सिद्ध करण्याचा मार्ग पत्काराला
जातो. जन्मवेळ शुद्धीकरण आताच केले जाते असे नाही तर पूर्वीही करत पण प्रमाण कमी
असे. त्या कामी गुलिक मांदी चा वापर करत. अजूनही काही पद्धती होत्या. बृहज्जातकातील
पाचवा सूतिकाध्याय (अथवा जन्मविधीनामाध्याय) या वरूनही अशी परीक्षा करत. डॉंक्टरांची
प्रार्थमिकता हि बाळ, बाळंतीन असल्याने ते त्यांच्या जागी योग्य. तरीही आता
रुग्णालये या नोंदी ठेवतात.
चर्चेत मुद्दा हा असतो की जन्मवेळ म्हणून कोणती वेळ घ्यावी? प्रथम रुदन, डोके
बाहेर येते ती वेळ, प्रसवकळा येतात ती वेळ? काही तर याच्याही मागे जावून शास्त्रात
उल्लेखलेली आधानकाळ हि जन्मवेळ घ्यावी याचा आग्रह धरतात. ज्योतिष विद्वानांन मध्ये
जन्मवेळे बाबत असलेली मतभिन्नता हेरून शास्त्राची टिंगल करणारेही हिनवण्यासाठीहि
हेतू पुरस्पर वाद काढतात. मी प्रथम रुदन हि वेळ जन्मवेळ म्हणून घ्यावी या मताचा
आहे. आपल्याच नक्षत्रप्रकाश ज्योतिष समुहावर
हा विषय निघाला तेव्हा माझे मत मांडले होते. जन्मवेळ शक्य तितकी आचुक मिळवण्यासाठी
काय करता येईल? यात
दोन गोष्टी मुख्य आहेत. १) डॉक्टरांचे अवधान २ ) घडयाळाची अचुकता. या दोन्ही
गोष्टींसाठी आता अधुनिक काळात मार्ग काढण्यासारखा आहे. तो म्हणजे टाईमर असलेला साउंड
रेकॉर्डर प्रसूती कक्षात ठेवणे. त्यातील घडयाळ सेकंद पर्यत वेळ दर्शवेल असे असावे.
बाळाच्या रडण्याचा आवाज त्यात रेकॉर्ड होईल. मुद्रीत आवाज व वेळ यावरून
सेकंदापर्यत जन्म वेळ सहज मिळवता येईल. या कामी मोबाईलचाही (सिम काढून घेवून, म्हणजे रेडिएशन कमी होईल ) वापर करता येईल.
बालक स्वतंत्रपणे प्रथम
श्वासोत्सवास करते तेव्हा रुदन करते. हि खून लक्षात घेवून जन्मवेळ म्हणून ती वेळ
घ्यावी हे मान्य करणारा मोठा वर्ग आहे. किंबहुना सर्वत्र (अपवाद असू शकतात) हिच
वेळ जन्मवेळ म्हणून नोंदवली जाते. तरीही आधानवेळ ही जन्मवेळ घ्यावी असे जोरदार
प्रतिपादन करणारेही बरेच आहेत, निदान चर्चेत तरी. या वरही माझे मत मांडले होते.
येथे थोडे सविस्तर लिहितो. एक गमतीची गोष्ट लक्षात आली, काहींच्या बाबतीत हं!
आधानवेळची महती तर सांगतात पण आधानवेळ म्हणजे काय व ती कशी घेतात हेच माहित नसते. दुसऱ्या
एखाद्या ग्रुपवर याविषयी चर्चेत कुणीतरी आधानवेळ हीच खरी जन्मवेळ सांगतो व हे
महाशय अधिक माहिती न घेता व विचारमंथन न करता तिसऱ्या ग्रुपवर मत मांडतांना चिकटून
देतात. शुक्रजंतूचा परिपक्व स्त्री बीजाशी संयोग होऊन स्त्री बीज फलद्रूप होण्याचा
काळ म्हणजे आधानकाल. प्रथम मी आपल्याच नक्षत्रप्रकाश
ज्योतिष समुहावरील चर्चेत केलेले मत प्रदर्शन पुनारोक्तीचा दोष स्वीकारून पुढे देत
आहे.
आधानकाळ हा जन्मवेळ साठी घेणे योग्य
नाही. मुख्य गोष्ट म्हणजे अधानकाळ हा गणितानेच काढावा लागतो. अशी आधानकुंडली हि
जन्मजात विकृती, वंशिक
आजार इ. साठी ठीक आहे. अधानकाळ हा देहाच्या उत्पत्तीचा आरंभकाल म्हणता येईल.
त्यामुळे देहाची रचना, दोष, या सारख्या बाबींसाठी अधानकुंडलीचा वापर एकवेळ योग्य ठरू शकेल.
अधानकाळातील एकपेशी पासून बहुपेशीय मनुष्य शरीर तयार झाल्यावर आत्मा त्यात प्रवेश
करतो. या साठी तीन मास लागातात. या वेळी आत्मा गर्भात प्रवेश करतो. पण नक्की दिवस, वेळ कळत नाही. चाणक्याच्या मते आत्माचा
गर्भप्रवेश जन्म वेळ मानावी. पण आत्म्याच्या प्रवेशा नंतरही सात मासा पर्यंत देह
परिपूर्ण होण्याची प्रक्रिया चालते. गर्भदेहाचे भरण पोषण हे नाळे व्दारेच
चालते.म्हणजे आत्मा प्रवेश तर करतो पण देह त्याच्या अधीन नसतो. तो स्वतंत्र नसतो.
येथून सुटका करण्या विषयी तो भगवंताला विनवतो. भगवंताला वचनेही देतो. याचे वर्णन
श्रीमद् भागवत महापुराण स्कंध ३ रा - अध्याय ३१ वा मध्ये आढळते. म्हणून पहिला
श्वास स्वतंत्रपणे घेवून देह आपल्या अधिपत्याखाली आणतो ती वेळ जन्म वेळ म्हणून
स्वीकारावी हे मला योग्य वाटते. अधानकाळा बाबत खात्री कशी देणार.
शास्त्राने जीव व आत्मा हे भिन्न मानले
आहेत.देह, जीव, लिंगदेह व आत्माराम अशा चार घटकांनी
आपण बनलो आहोत. आधानकाळी जीव असतो पण आत्मा नसतो. लिंगदेह तीन महिन्यांनी गर्भात
प्रवेश करत असावा. स्थूलदेह, प्राणदेह (लिंगदेह), मनोदेह, कारणदेह,महाकारणदेह (सूक्ष्मदेह) इ. देह सांगितले आहेत. आत्मा सुक्ष्मदेहात
असतो. स्थुलदेहावर या विविध देहांची अवरणे सात महिन्यात चढतात. गर्भात आत्म्याची
चेतना सूक्ष्मदेहात असते. प्रथम रुदनाच्यावेळी ती स्थूलदेहात येते, यालाच देहाभिमान म्हणतात. आत्मभान
जावून देहभान येते. काही वेळा मुल रडत नाही तेव्हा प्रयत्न करून (चिमटे काढून इ.)
देहभानात आणतात. म्हणूनही मी प्रथम रुदन हि जन्मवेळ माननाच्या पक्षाकडे आहे.
वेदातील गर्भविज्ञान
यावर डॉ. प. वि. वर्तक यांचा लेख Indian Medical
Association च्या जनरलमध्ये १९७६ प्रसिद्ध झाला होता. ‘गर्भधारणेसंबंधीचे
वेदांतील विवेचन’ यावर डॉ. शरद जोगळेकर यांचाही मराठीतून लेख आहे.
वरती तीन मासा नंतर आत्मा प्रवेश करतो असे म्हटले पण साधारण १८ ते २० व्या
आठवडयात आईला गर्भाची हालचाल जाणवते म्हणजे यावरून साधारण चौथ्या/पाचव्या महिन्यात
आत्मा गर्भात प्रवेश करतो असे म्हणता येईल. हा हि केवळ तर्क आहे की हालचाल झाली
यावरून आत्मा प्रवेश झाला. कारण असे की जीव हा दुसऱ्या आत्माच्या अधिपत्याखाली हि
कार्य करतो हे अंग प्रत्यारोपनावरून सिद्ध होते. जिवंत व्यक्तीचे अवयव काय पण मृत
व्यक्तीचे अवयव सुद्धा विशिष्ट निकष, काळात दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात कार्य
करतात हे तर आपण बघतोच. आत्मा गेल्या नंतर काही काळाने जीव जातो असे म्हटले जाते. संभव
आहे की गर्भातील जीव मातेच्या आत्माच्या आधिपत्या खाली कार्यरत होत असावा. हि
गोष्ट अध्यात्मातील गहन गोष्ट आहे. एक संदर्भ देतो. आपल्याला विषयांतर करायचे नाही,
पण आधार दिल्या शिवाय माझेही समाधान व्हायचे नाही. जीव व आत्म्याच भिन्नत्वा साठी
देत आहे. पातंजल योग सूत्रे आध्याय तिसरा (विभूतीपाद) सूत्र ४९-
|| सत्वपुरुषान्यताख्यातीमात्रस्य सर्वभावाधिष्ठातृत्वं सर्वज्ञातृत्वं
च ||
अर्थ- सत्व (जीव) आणि पुरुष हे दोन वेगळे आहेत या ज्ञानानेच सर्व भावांवर अधिकार मिळतो आणि सर्वज्ञान प्राप्त होते.
|| सत्वपुरुषयो: शुद्धीसाम्ये कैवल्यम्
|| |५५|
अर्थ- जीव आणि पुरुष यांच्या शुद्धतेमध्ये साम्य आले की उरते फक्त कैवल्य.
सांगायचे एवढेच आहे की आचार्य चाणक्यांच्या मताची अंमलबजावणी आपल्या सारख्या
सर्व सामान्यांना शक्य नाही. स्त्री
बीज फलद्रूप झाल्या पासून आठ आठवड्या पर्यंत भ्रूण व त्यानंतर गर्भ हि संज्ञा वापरली
जाते. हा हि मुद्दा विचारात घेण्या सारखा आहे. जर आठ
आठवडे पर्यंत भ्रूण आहे तर आधानकाळ हा जन्मकाळ म्हणून कसा स्वीकारावा? या वरून
तितका काळ तरी मातेच्या शरीर अवयवा प्रमाणे तो धरावा का? वरती जे मत मांडले त्यात “स्थुलदेहावर
या विविध देहांची अवरणे....”हे
चुकले आहे. एक संदर्भ मिळाला तैत्तिरीय उपनिषदाचा, त्या नुसार जडदेहाच्या
(अन्नमयदेह) आत प्राणमयदेह, प्राणमयदेहाच्या आत मनोमयदेह, त्यात विज्ञानमयदेह,
त्यात आनंदमयदेह व आनंदमयदेहाच्या आत आत्मा असतो. आपल्या लेखाचा विषय जन्मवेळ आहे
मग आध्यात्माचा विषय असलेले हे मी का देतोय. तर चौथ्या/पाचव्या महिन्यात आत्माने
गर्भात प्रवेश केला, सातव्या महिन्यात देह पूर्ण होतो. प्रसूती साठी तरीही अजून
दोन महिने का लागतात? शास्रीय कारणे तर आहेतच पण या कालात आत्मा व अन्नमयदेह यात
हे विविध देह निर्माण होत असावेत. नालछेदाना नंतर प्रथम श्वासाच्यावेळी आत्मा
देह्भानात येत असावा म्हणजे ‘मी म्हणजे हा हाडामासाचा देह’ हा भाव येवून देहाचे
नियंत्रण आत्मा घेत असावा.
आता काही ज्योतिष शास्रीय संदर्भ पाहू. श्रीबलभद्र कृत होरारत्न नामक ग्रंथात पहिल्या
अध्यायात कल्यानवर्मा कृत सारावलीतील आधानाध्याय दिलेला आहे. यात पराशार, यवनाचार्य,
आचार्य वराहमिहीर, वशिष्ठ, गर्ग, कल्यानवर्मा, बादरायण यांचेहि मते दिली आहेत.
प्रत्येक महिन्यात काय होते, गर्भाचा विकास कसा होतो या
विषयी त्यात श्लोक आहेत. थोडे मतांतर आहे. त्यात पराशरांचे म्हणून श्लोक ५९ ते ६९
या संदर्भात दिलेत. त्यातील
याचा अर्थ आठव्या महिन्यात जीव गर्भात भ्रमण
करतो म्हणून या महिन्यात गर्भ जीवन धारण करत नाही ते योग्य आहे, असा दिला आहे. हे
संभ्रमात टाकते. जीव गर्भात भ्रमण करतो पण जीवन धारण करत नाही म्हणजे आत्मा प्रवेश
करत नाही असे ऋषी पराशरांना म्हणायचे आहे काय. येथे जीवन म्हणजे कर्मरत होणे
अभिप्रेत आहे काय? बालक श्वास घेते व कर्म चालू होतात. एकंदरीत आत्म्याचा गर्भ
प्रवेश ही जन्मवेळ घेणे झेपण्या सारखे नाही.
आता आधानकाळा कडे वळू. आधानकाळाची
व्याख्या वरती दिली आहे. त्यावरून हे स्पष्ट होते की प्रसवकालाचे ज्ञान जसे चर्मचक्षु
निरीक्षणाने नोंदवता येते तसे आधानकाळ नोंदवता येणार नाही. मग पूर्वाचार्यांनी
आधानकाळा वर भाष्य का केले. आचार्य वराहमिहीर
कृत बृहज्जातक ग्रंथात निषेकाध्याय म्हणून चवथा अध्याय आहे. यावर भट्टोत्पल लिहितात
– अथातो निशेकाध्यायो व्याख्यायते | तत्रादावृतौ सति
गर्भाधानमित्यात..| गर्भाधान यात आधान म्हणजे स्थापित करणे, गर्भस्थापित करणे.
या वरून असे सांगितले जाते की निषेककाल (विर्योत्सर्ग) हा आधानकाळा म्हणून घेत. प्रयत्नाने निषेककाल ज्ञात होऊ शकतो. तरीही आचार्य भट्टोत्पलांनी अथाधानप्रश्नमध्ये, आधानलग्नात्प्रश्नलग्नाव्दायोsस्त अशी
शब्द रचना करून अधानलग्न वा प्रश्नलग्नात अशी अशी ग्रह स्थिती असता.... असे
सांगितले आहे. या वरून निषेककाल/आधानकाल विषयी खात्री नसावी म्हणून प्रश्नकाला वरूनहि गर्भा संबंधित
प्रश्नांची उत्तरे द्यावी असे ते सांगतात. पराशरी, बृहज्जातक,
सारावली इत्यादी ग्रंथात आधानाकाला विषयी दिले आहे. मग तरीही ती वेळ जन्मवेळ
म्हणून का घ्यायची नाही? बृहज्जातकातील चौथा निषेकाध्याय व सारावलीतील आधानाध्यायचे
अवलोकन केले असता लक्षात येते कि या वरून प्रसुतीकाला पर्यंतच्याच प्रश्नांचा
विचार केला आहे. सर्व श्लोक येथे देणे शक्य नाही. काय पाहिले जाते त्याची साधारण
यादी देतो. गर्भधारणा होईल कि नाही?, माता पित्यास आरिष्ट, गर्भास शुभाशुभ, गर्भनाश,
गर्भारपणात मातेचा मृत्यू, कन्या अथवा पुत्र गर्भ, नपुंसक जीवाची उत्पत्ती, जुळी/तिळी
संतती व त्यातील कन्या/पुत्र किती, जन्मजात विकृती (अधिक अवयव, मुका, बहिरा, आंधळा,
अपंग, बुटका इ.इ.), सगर्भा मृत्यू, मृत अर्भक जन्म. यात कुठेही आधानकुंडली वरून बालकाचा
स्वभाव, अर्थार्जन, विवाह, घर, संपत्ती, वाहन, तीर्थयात्रा इत्यादी सारख्या
विषयांचा विचार नाही. बृहज्जातक निषेकाध्यायातील श्लोक नववा देत आहे.
आधान वा प्रश्न लग्नात मंगळ, सप्तमात रवी असता मातेचा शस्राने मृत्यू होतो. गर्भधारणे पासून प्रसव पर्यंतच्या ज्या महिन्याचा मासाधीपती पिडीत असेल त्या महिन्यात तत्काल मृत्यू होतो. श्लोक १६ मध्ये मासाधीपती दिले आहेत. या श्लोकातील शस्रकृतं या वरून त्या काळी सिजेरीन होत असावेत का? असो, या वरून आधानकाळा हा जन्मवेळ म्हणून घ्यावयास पूर्वाचार्य सांगत नसावेत असे म्हणता येते. आता सारखे त्या काळी गर्भ राहिला अथवा नाही, गर्भाची स्थिती इ. विषयी जाणून घेण्यासाठी साधने नव्हती (आयुर्वेदाचार्यांची माफी मागून. त्यात काही तपासण्या असतील). त्यामुळे निषेककाल/प्रश्नकाला वरून जिज्ञासापूर्ती केली जात होती.
दैवज्ञाभरण ग्रंथात तिसऱ्या अध्यायात तीन वेगवेगळ्या कुंडल्यांचे महत्व दिले
आहे.
लग्नं तू
त्रिविधं प्रोक्तं निषेकाधानजन्मात: |
जन्म तू त्रिविधं शिर्षम् नाभिपादोद्यानिच ||४७||
तीन लग्ने कोणती तर निषेक, आधान व जन्मलग्न. इथे स्पष्टपणे जन्मात:
शब्द आलाय. हे जन्मात: कसे घ्यायचे या विषयी आचार्य पुढे म्हणतात त्रिविधं म्हणजे तीन प्रकारे घेवू शकतात. शीर्ष–डोके,
नाभि-बेंबी, पाद-पाय. उद्यानीच याचा अर्थ येथे बाहेर येणे घ्यायचा आहे. डोके किंवा
पाय समजू शकतो पण आचार्यांनी नाभी का म्हटले? नाळ नाभिशी जोडलेली असते पण नाळ कधी
प्रथम बाहेर येते का? माहित नाही. आचार्य जन्मवेळे साठी येथे अंगदर्शनाची शिफारस
करतायेत. नाभी नाळछेदना संदर्भात तर नाही ना? नाळछेदन केल्यावर नाभी दर्शन होते. तसेच
नाळछेदन केल्यावर माते कडून होणारी रसद तुटते व बालक स्वत: श्वास घेते. आता या तीन
लग्ना वरून काय पहायचे या विषयी पुढच्या श्लोकात आचार्य मार्गदर्शन करतात.
निषेके पुत्रजननं चाधाने गर्भसंस्थिती:
|
जन्मलग्ने फलं सर्वारिष्टभावादीकंतुयत् ||४८||
निषेका वरून पुत्रजननं. काय म्हणतायेत आचार्य
पुत्रजन्म! आचार्य येथे अपत्य शब्द वापरू शकले असते. बृहज्जातक निषेकाध्यायातील
श्लोक तीन मध्ये आचार्य वराहमिहीर निषेका वरून गर्भधारणा संभवनेचे योग देतांना भवत्यपत्यं असा शब्द योजतात. भवत अपत्य अशी त्याची फोड
होते. दैवज्ञाभरण रचनाकार मात्र वंशाच्या दिवा ने प्रेरित दिसतात. पुत्रजननं चा
भावार्थ आपण मात्र संतती
असा घेवू. आचार्य कल्यानवर्मा सारावलीतही गर्भधारणा संभवनेचे योग देतात. म्हणून
निषेककाला वरून गर्भधारणा संभवना पहावी. आधाना वरून गर्भसंस्थिती: गर्भाची स्थिती पहावी.
वरती एके ठिकाणी आपण बघितले कि निषेक व आधान हा एकच समजतात, मग दैवज्ञाभरण येथे दोन्ही वेगळे सांगतात कसे. आधानकाळ अत्याधुनिक
साधानांनीही सहज समजत नाही. आधानकाळ निषेकावरून
काढतात. अजून दुसऱ्या प्रकारे काढतात पण तो संदर्भ इथे लागू होत नाही, पुढे पाहूच.
जन्मलग्ना वरून जीवनातील आरिष्टे, सुख दुख: इ. भाव वगैरे फले बघावीत. मला वाटत
यावरून पुरेसे स्पष्ट होते कि आधानकाल हा जन्मवेळ म्हणून घेवू नये.
आता जो मुद्दा मांडणार आहे त्या नंतर जर काही
शंका अजून असेल तर आधानकाल हा प्रसुतीकाला पेक्षा जन्मवेळ म्हणून कसा अयोग्य आहे
हे पटेल. आधानकाल हा दोन प्रकारे काढतात एक निषेककाला वरून व दुसरा प्रसुतीकाला
वरून. प्रथम निषेककाला वरून बघू. गणकभास्कर श्री. विष्णू नवाथे यांच्या सुलभ जातक,
भाग ५ मधील ‘गर्भसंभवकाल मिमांशा’ या चवथ्या प्रकरणात निषेका नंतर साधारण
पाच दिवसाच्या आत कधीतरी गर्भसंभव (आधान)
होतो, असे म्हटले आहे. बघा कधीतरी म्हटले आहे आणि हे त्यांनी तत्कालीन वैद्यकीय
संशोधना नुसार म्हटले आहे. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे ‘ज्योतिष सोबती’ या क्रमिक
पुस्तकातील ‘आधान कुंडली’ या प्रकरणात म्हटलय – निषेक व गर्भधारणा समय यात ३
ते ४८ तासा पर्यंत अवधी सर्वसामान्यपणे जाऊ शकतो. पुढे ते हा काळ ७२ तासा (३ दिवस)
पर्यंतही गेल्याचे आढळते असे म्हणतात. मुळात निषेककालच अचूक, सूक्ष्म मिळणे आवघड, त्या
वरून प्रमाणित आधानकाल वरील अंदाजा वरून कसा मिळेल? आता समजले आचार्य भट्टोत्पलांनी
प्रश्नकाल का सांगितला. बर हे अंदाज बहुतांशी पाश्चात्य संशोधकांच्या भरवस्यावर
असतात. ते प्रत्यक्षप्रमाण मानतात. त्यांनी शेकडा किंवा हजारात जोडप्यांवर
निरीक्षणगृहात प्रयोग करून निषेककाल नोंदवून ठेवून अत्याधुनिक साधनसामग्री ने वरील
अवधी काढला हि असेल. ते हे करू शकतात. तरीही निष्कर्ष हा निषेका नंतर अमुक इतक्या
तास मिनिटात आधान होतेच असा आला नाही. आता दुसरा प्रकार म्हणजे प्रसूतीकाला वरून
आधान काढणे. म्हणजे बघा फिरून फारून आलो कुठे, शेवटी प्रसूती कालावर. आता हे
प्रकरण निषेका वरून आधान इतके सोपे नाही. जरा किचकटच आहे. काही गृहीतीके, तक्ते
यांचा वापर करावा लागतो. इथे ते सर्व देत बसत नाही. सुलभ जातक, ज्योतिष सोबती यात
ते दिले आहेत. प्रसवकाला वरून आधानकाल काढण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती फक्त
सांगतो. १) स्पष्ट जन्मलग्न व जन्मचंद्र याचे अंश. २)चंद्र शुक्ल पक्षातील की
कृष्ण पक्षातील. ३)चंद्र उदित की अनुदित गोलार्धातील. ५)पुरुष जन्म की स्री जन्म. ६)
गर्भकाल नियमित कि अनियमित. यातही वेगवेगळ्या पद्धती आहेत. ज्योतिष सोबती मध्ये
नित्यानंद पद्धती व नंदराम मिश्रा पद्धती यांचा उल्लेख आहे. पाश्चिमात्यांच्याहि
पद्धती आहेत. आता वेगवेगळ्या पद्धती आहेत म्हणजे त्या वरून येणारा आधानकाल हि एकच
येणार नाही हे उघडच आहे.
आता एवढी उलट तपासणी
घेतल्यावर मला समजत नाही कि अचूकते साठी आधान कुंडली वापरा म्हणणारे कशाच्या
आधारावर म्हणतात. जे जन्मजात विकृती, वांशिक आजार सारख्या गोष्टीं साठी सुचवतात ते
योग्य म्हणता येईल. पण इतर गोष्टीं साठी कसे काय. पाश्चिमात्त्यांच्या आधारावर?
त्यांचे काय आहे, “तुम तो ठहरे परदेशी, साथ क्या निभाओगे ...” ते प्लुटोला आधी
ग्रह म्हणतात व नंतर त्याचा ग्रहाचा दर्जाच काढून घेतात. या बाबतीत पाश्चिमात्य ज्योतिर्विदांनी
संशोधना अंती आधानकुंडलीची मह्त्ता सिद्ध केली असे सांगतात. पण विवाह, नोकरी पेशा,
सांपत्तिक स्थिती इत्यादी सारख्या फलादेशा साठी की शारीरिक विकृती, वंशिक आजार इ.
साठी. हे कोणी सांगत नाही. मित्रांनो मला त्याना डावलायच नाहीये, पण अंधश्रद्धेने
ते म्हटले म्हणजे संपले असेही करू नये. शारीरिक विकृती, वंशिक आजार इ. बाबतीत
संशोधना अंती त्यांनी जर निष्कर्ष मांडला असेल तर प्राचीन भारतीय ज्योतिर्विदांनी
जे सांगितलय त्याला बळकटीच मिळते. पाश्चीमात्यां बरोबर आपल्या कृषीमुनी, आचार्यांच्या
मताचाही योग्य आदर करावा. धन्यवाद.
दिवाळी अंकाची प्रिंट कॉपी आउट ऑफ स्टॉक आहे. त्याचे डिजिटल वर्जन मोफत आहे. ही घ्या याची लिंक https://gmjyotish.blogspot.com/p/blog-page_27.html लिंक क्लिक केल्यावर अनुक्रमणिका नावाचा शब्द मुखपृष्ठाच्या खाली दिसेल. त्यावरही क्लिक केले की संपुर्ण अनुक्रमणिका दिसेल ज्यात १० लेख व एक पान लेखकांची ओळख आहे. यातील आपल्याला आवडेल तो लेख आधी वाचा तसेच सर्व लेख वाचायला विसरु नका. दिवाळी शके १९४० या आनंदमयी पर्वाच्या सर्वांना शुभेच्छा !





तर मग जुळ्यांचे फलादेश कसे काढायचे यावर मार्गदर्शन करा 🙏😊
उत्तर द्याहटवाजूळयांची एक केस स्टडी ब्लॉग वर आहे. कृपया ती वाचावी, जुळ्यांचे ग्रहयोग म्हणून आहे.
हटवा