मंगळवार, २३ जुलै, २०१९

मासांत

|| श्री ||



मासांत


एका धार्मिक ग्रुपवर खालील पोष्ट आज वाचण्यात आली त्या अनुसंगाने काही लिहित आहे. खालील पोष्ट ग्रुपवर होती.  

तसा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो कि उत्तर भारतात व महाराष्ट्रात हिंदू महिण्याची सुरवात वेगवेगळी का? उत्तर भारतात हिंदू मास हा पोर्णिमांत (म्हणजे महिन्याची शेवटची तिथी पौर्णिमा.) तर महाराष्ट्रात हिंदू मास हा आमांत (म्हणजे महिन्याची शेवटची तिथी अमावाश्या.) असे का? महिन्याचा शेवट कोणती तिथी असावी या साठी आपल्या प्राचीन ग्रंथात काही निर्देश दिलेत का? हो आहेत, आहेत ना. हा भाग ज्योतिष शास्त्रातील संहिता विभागात येतो. ज्योतिषशास्त्राचे जे आठरा प्रवर्तक आहेत त्या पैकी श्री नारद एक त्यांच्या नारद संहितेत तिसऱ्या अध्यायात श्लोक ८१ या संबंधी दिला आहे. तो खालील प्रमाणे.



अर्थ:- माघ महिन्या पासून प्रत्येकी दोन दोन महिन्यांचा शिशिर इत्यादी ऋतू क्रमाने येतात. चंद्रमास अमावाश्येला समाप्त होतो. (दर्शावधि याची दर्श + अवधी अशी फोड होते. दर्श म्हणजे अमावश्या व अवधी म्हणजे काळ.) सौरमास संक्रातीला समाप्त होतो आणि सावनमास ३० दिवसांनी पूर्ण होतो असा या श्लोकाचा अर्थ आहे.  

यात आपल्या चर्चित विषयाला महत्वाचा संदर्भ मिळाला तो म्हणजे ‘चांद्रो दर्शावधि’ या नुसार महाराष्ट्रातील पंचांग मास समाप्ती ही अमावश्येला करतात. ग्रहलाघवी ग्रंथही या साठी वापरत. उत्तरभारतात सूर्य सिद्धांत हा संहिता ग्रंथ अधिक प्रचलित आहे. लोकमान्य टिळकांनी दृकप्रत्ययतुल्य पद्धतीच्या अवलंबाचा पुरस्कार केल्यावरही तिकडे अजूनही काही पंचांग गणित सूर्यसिद्धांतावर करतात. त्यात कदाचित पौर्णिमांत मास दिले असावे. हे ग्रंथ माझ्या कडे नाहीत त्यामुळे संदर्भासहित स्पष्टीकरण नाही देवू शकत.

                                                      धर्मसिंधु ग्रंथात प्रथम परिच्छेदात  शुक्लप्रतिपदादिदर्शातैश्चैत्रादिसंज्ञैर्व्दादशाभिर्मासैश्चतू: अशी ओळ आहे. यात शुक्लप्रतिपदादिदर्शातै म्हणजे शुक्लप्रतिपदे पासून अमावश्ये पर्यंतचे दिवस म्हणजे चांद्र मास असे धर्मसिंधुकारही म्हणत आहे. पण याच परिच्छेदात ते पुढे म्हणतात.
 यात शुक्लप्रतिपदादिरमांत – शुक्लप्रतीपदे पासून अमावाश्ये पर्यंत. कृष्णप्रतिपदादि:पूर्णिमांतो – कृष्णप्रतिपदे पासून पोर्णिमे पर्यंत वाचांद्रोमास: - दोघांपैकी कोणताही चंद्र महिना होतो. असे असले तरी धर्मसिंधुकार लगेच पुढे म्हणतात तत्रापिशुक्लादिर्मुख्य: तत्रापि – तथापी, शुक्लादीर – शुक्लपक्ष ते अमावाश्या, मुख्य: - हा मुख्य आहे. म्हणजे धर्मसिंधुकारांनी आमांत व पोर्णिमांत दोन्हींना महिना म्हणून मान्यता दिली असली तरी आमांत महिना हा मुख्य असल्याचेही लगेच सांगितले. आमांत मास मुख्य आहे मग पोर्णिमांत मासाचे प्रयोजन काय या विषयी ते लिहितात “कृष्णादिर्विध्योत्तरएवग्राह्य:” विंध्योत्तर – विंध्याद्री पर्वाताच्या उत्तरेला पोर्णिमांत ग्राह्य धरावा. (म्हणजे गोदावरीच्या उत्तरतीरा पासून पोर्णिमांत व दक्षिणतीरा पासून आमंत असे जे म्हणतात तसे नसून विंध्यपर्वताच्या संदर्भाने आहे.) एवग्राह्य शब्द वापरल्याने तो धरलाच पाहिजे असे नाही तर पोर्णिमांत धरायचा असेल तर तो विंध्याद्री पर्वाताच्या उत्तरेलाच धरावा असे मत दिसते. हे सांगतानाही ते बजावतात “कार्मादौस्मर्तव्य” श्रौतादिकर्माच्या संकल्पाच्या वेळी शुक्लादिकच म्हणजे आमांतच घ्यावा. म्हणजे पोर्णिमांत जरी उत्तरेत ग्राह्य असला तरी तेथेही संकल्पाच्या वेळी मात्र आमांतच घ्यावा असे धर्मसिंधूकरांचे मत आहे. तसा हा ग्रंथ अर्वाचीनच म्हणावयाचा उणेपुरे २२९ वर्षांचा तर आहे. त्यावेळी उत्तरेत हिंदू महिना पोर्णिमांत असला तरी संकल्पावेळी आमांत घेणे हे चांगलेच प्रचलित असावे.

आता या बाबत माझा तर्क देतो तो असा. आमांत मासाचा पुरस्कार करणाऱ्यांनी कदाचित हा विचार केला असावा कि अमावश्येला चंद्राची एकही कला शिल्लक नसते म्हणजे शेवट, म्हणून महिना समाप्ती. पोर्णिमांत मासाचा पुरस्कार करणाऱ्यांनी पौर्णिमेला चंद्र १६ कला पूर्ण असतो म्हणजे चंद्राचे तेजपूर्णत्व होते म्हणून महिना पूर्ण असा विचार केला असावा.

या पोष्ट मध्येच एक कमेंट आली जी शंका अजूनही काही जणांना होती ती अशी – “मला कोणी सांगू शकेल का श्रावण महिन्यात कृष्ण जन्माष्टमी hi कृष्ण पक्षात असतें मग हिंदी पंचांगा नुसार ती शुक्ल पक्षात येते असं का?

- नाही, असा पक्ष बदल होत नाही. या बाबत असे आहे कि महिन्याचा शेवट अमावश्या कि पौर्णिमा असा भेद आहे. पण महिन्याचे पक्ष बदलत नाही, कारण ते दृश्य चंद्रावर आधारित आहे. पूर्ण चंद्र म्हणजे पौर्णिमा तर अदृश्य चंद्र म्हणजे अमावश्या. अमावश्ये नंतर पोर्णिमे पर्यंत चंद्रतेज कला कला ने वाढते तो शुक्लपक्ष (शुद्ध) तर पोर्णिमे नंतर अमावाश्ये पर्यंत कला कलाने चंद्रतेज कमी होतो तो कृष्णपक्ष हे दोन्ही मतात तसेच असतात ते बदलत नाहीत. महाराष्ट्रात महिन्याची सुरवात हि शुक्ल प्रतीपदे पासून म्हणजे शुक्ल पक्षात होते तर उत्तरभारतात महिन्याची सुरवात कृष्ण प्रतीपदे पासून म्हणजे कृष्ण पक्षात होते. पौर्णिमा, अमावश्या किंवा कोणतीही तिथी हि दोन्ही कडे सारख्याच वेळा असते. त्यामुळे दिवाळी, कृष्ण जन्माष्टमी इ. सारखे सन एकाच वेळी येतात. आता ज्या वरून चर्चा चालू झाली ते श्रावणी सोमवार हे तिथीप्रधान नाहीत तर मास व वार या वर आधारित आहे, त्या मुळे ते महाराष्ट्रा पेक्षा एक पक्ष लवकर तिकडे सुरु होतात. हा लेख वाचल्यावर आता या वरही एक शंका निर्माण होऊ शकते ती काय असू शकते आणि त्याचे समाधानही पुढे करतोच आहे.

“ठीक आहे मासांत भानगड समजली, पण तरीही मी काय म्हणतो उत्तरभारतात आधीच महिना सुरु का होतो? नाही म्हणजे अमावास्या पौर्णिमा हे चक्र चालूच राहते ना, मग महाराष्ट्रात अमावश्ये नंतर महिना चालू झाल्यावर त्यानंतर येणाऱ्या पोर्णिमे नंतर ते त्यांचा महिना का सुरु करत नाहीत, आधीच का?

आलीना ही शंखा मनात, मला माहित आहे आणि यायलाच हवी. बरोबर आहे पहिले आम्ही, पहिले आम्ही (किंवा पहले आप, पहले आप) अस त्या वेळी झाल का? तस होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण स्पष्ट शास्त्र निर्देश या बाबत आहेत आणि ज्योतिषशास्त्राच्या सर्वच प्रवर्तकांनी ते एक मुखाने लेखी मतदानाने मान्य  केले असावे. देतो ना, तो श्लोकही देतो की. घ्या नारदसंहिता, अध्याय तिसरा श्लोक ८४.


हाच, हाच तो श्लोक (कलम ८४) ज्या मुळे उत्तरभारतीयांना आपल्या अगोदर महिना सुरु करण्याचा विशेषाधिकार मिळाला. काय म्हणतो हा श्लोक? हा श्लोक आपल्याला पौर्णिमेचे व हिंदू महिन्याचे नामकरण नियम सांगतो. तन्नक्षत्र – त्या नक्षत्रात, पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राच्या नावावरून ती पौर्णिमा व हि पौर्णिमा समावलेला महिनाही त्या नक्षत्राच्या नावावरून ओळखला जावा.

उदा. या वर्षी १६/७/२०१९ च्या पौर्णिमे नंतर उत्तरभारतीयांचा महिना बदलला त्या मुळे हि पौर्णिमा या नवीन महिन्यात येणार नाही हे ओघाने आलेच, तर १/८/२०१९ च्या अमावाश्ये नंतर महाराष्ट्रातील महिना बदलेल बरोबर. १७/७/२०१९ ते १५/८/२०१९  दरम्यान हा उत्तरभारतीयांचा हिंदू महिना तर २/८/२०१९ ते ३०/८/२०१९ दरम्यान महाराष्ट्रीयांचा हिंदू महिना. ज्या वरून महिन्याचे नाव ठरते ती कोणती पौर्णिमा या दोन्ही मतांच्या महिन्यात येते तर ती आहे १५/८/२०१९ ची पौर्णिमा. या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात आहे म्हणून दोघांनीही नियमानुसार त्यांच्या महिन्याचे नाव श्रावण ठेवले. इति.

रविवार, २१ जुलै, २०१९

यक्षिणीची कांडी -१

|| श्री || 


यक्षिणीची कांडी - १




ज्योतिष विषयक काही ग्रुप वर एका ज्योतीर्विदाने एक पोष्ट शेअर केली. ती अशी :- 

“चला, सांगा पाहू लग्न कोणते असेल?
नुकतीच एक पत्रिका तयार करायला आली होती. त्यांनी दिलेल्या वेळेवरून मेष लग्न 00.08.08 वर आहे. म्हणजे अगदी त्याच मिनिटाला मेष लग्नाची सुरुवात आहे. मी चेक करण्यासाठी कुंडली एका मिनिटाने मागे घेतली तर लग्न होत मीन 29.49.28. कुणाच्याही जन्मवेळेत एका मिनिटाचा फरक अगदी सहजपणे पडू शकतो. यात चूक अशी कोणाचीच नसते. एरवी ते ठीक असतं. पण ह्या केस मध्ये लग्नच बदलत होतं. आता प्रश्न हा आहे कि या जातकाच नेमकं लग्न कोणतं असेल?
लग्न कन्फर्म करण्यासाठी मी खालील प्रमाणे रुलिंग प्लॅनेट घेतले.

दिनांक 17.07.2019 वेळ 23.04
L/S-शनी
L - मीन -गुरु
s - श्रवण-चंद्र
R- मकर-शनी
D-बुधवार-बुध

आता तुम्ही सांगा लग्न मीन असेल कि मेष. उत्तर स्पष्टीकरणा सहित द्यावे. हि विनंती. चुकलं तरी हरकत नाही.
मी अर्थातच उत्तर काढलेलं आहे. ते रविवारी सकाळी ह्याच पोस्ट ला एडिट करेन किंवा कंमेंट बॉक्स ला लिहेन.
पहा तुम्ही पण प्रयत्न करून.”

आता इथे आपल्याला काही भाकीत करायचे नाहीये तर तांत्रिक बाब हाताळायची आहे. ग्रुपवर मी माझ्या परीने विश्लेषण केले आहे तेच इथे देतो आहे. 

मांडलेला सराव प्रश्न प्रथमदर्शनी खूपच सोपा वाटतो. जातकाने दिलेल्या जन्मटिपणा नुसार जन्मलग्न मीन-मेष संधीवर आहे. फलितासाठी लग्न निश्चित करणे आवश्यक आहे त्यामुळे त्यांनी जन्मवेळ शुद्धीकरणाचा निर्णय घेतलेला दिसतो. त्यासाठी त्यांनी जे रुलिंग घेतले ते टिपण त्यांनी दिले आहे. त्या प्रमाणे त्यांनी लग्न निश्चित केलेले आहे. त्याचे विश्लेषण ते येत्या रविवारी देणार आहेतच. या वर इतर कसा विचार करतात हे त्यांना पहायचे आहे. रुलिंग मध्ये गुरु आहे शिवाय बुधही आहे. त्यामुळे मीन लग्न रेवती नक्षत्रात शनिचा सब हा जन्मबिंदू येईल ‘हाय काय अन नाय काय’, नाही का? अजून सूक्ष्म विचार करायचाच  झाले तर शनीच्या सब मध्ये चंद्राचा सबसब घेवून त्यात शनिचाच सबसबसब घेतला कि झाले. म्हणजे मीन लग्न २९ अंश १० कला ४० विकला २ सूक्ष्मकलेच्या आसपास येईल. या मुळे जातकाची जन्मवेळ साधारण ३ मी. ८.४ सें. ने मागे जाईल. पSSSSSण...........


SSSSSण, हा पण जो आलाय तो काही के.पी. अभ्यासका साठी नवीन नाही. तो म्हणजे जे चार शासक ग्रह मिळालेत त्या पैकी बुध, गुरु, शनी हे वक्री आहेत.  गुरु, बुध वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असल्याने त्यांचा विचारच करता येणार नाही. केवळ चंद्राच्या जोरावर लग्नबिंदू पर्यायाने जन्मवेळ निश्चित करता येणार नाही. लग्नबिंदू राहूद्या पण नुसती लग्नरासही निश्चित होणार नाही. कारण संभ्रम मीन की मेष असा आहे, चंद्र कर्करास दाखवेल.  मीनेत किंवा मेषेत चंद्राचे नक्षत्र नाही, त्यामुळे इथेही तो निरुपयोगी ठरतो. 


जन्मवेळ सेकंदा पर्यंत गेला बाजार मिनिटां पर्यंत तरी काढता येईल असा लग्नबिंदू अपणाला हे रुलिंग काही मिळवून देणार नाहीत. अगदी लग्नरास हि सांगत नाहीयेत. कदाचित या मुळेच अजून पर्यंत म्हणजे हा दुसरा भाग लिहायला घेई पर्यंत तरी (रात्री ८:३८) कुणी लग्न कोणते ते या ग्रुपवर सांगितले नसावे. (अन्य ग्रुपवर सांगितले असल्यास मी अनभिज्ञ असल्याने क्षमस्व.) जन्मलग्न, जन्मचंद्र व रुलिंग लग्न, रुलिंगचंद्र यांच्या कोरुलरर्स वरून निश्चिती करण्याचीही पद्धत वापरता येणार नाहीये कारण जातकाचे डिटेल पुरवण्यात आलेले नाहीत. जे काही करायचे आहे ते फक्त यक्षिणीची कांडी वापरून, अन तिच्यात तर नावापुरतीच जादुईशक्ती दिसते. मग आता आपणही हात झटकून शांत बसावे कि काय? 


नाही, खरोखरच रुलिंग काहीच दाखवायला तयार नाहीत का? नाही अजून हार मानता येणार नाही. आहे, अजून एक प्रावधान आहे. ते वापरू या की. ओपनर नाही खेळले म्हणून काय झाले पुढची फळी आहे की. रुलिंग मधील ग्रहांच्या युतीतील किंवा रुलिंग लग्नावर दृष्टी असाणाऱ्या ग्रहांना फलंदाजीला पाठवता येते. पण हे प्रावधान गुरुवर्य श्री.कृष्ण्मुर्तीचे कि त्या नंतरचे या बाबत माझ्या कडे माहिती नाही. या साठी रुलिंग घेतेले त्याचे स्थानांश लागतील ते मी पोष्टकर्त्यांना विचारले होते त्यांनी माहिती दिली ती अशी “Yogesh Daithankar R.P. Chiplun, 17.53.12. 73.52.” आता हे स्थानांश त्यांनी दशमान पद्धतीचे दिले कि षष्ठमान पद्धतीचे ते स्पष्ट केले नाही. त्यांना त्रास तरी किती देणार. त्यामुळे मीच गुगली करून स्थानांश काढले ते असे  चिपळून – १७/३१/५२N, ७३/३१/१४E.
पण याचा उपयोग झाला नाही कारण लग्नावर अंशात्मक किंवा दिप्तांश दृष्टी कुणाचीच नाही. रुलिंग मधील शनीच्या युतीत केतू आहे तोच काय तो हाताला लागला. लग्न कोणते याचा निकाल त्याने दिला. मेषेत केतूचे नक्षत्र आहे. जातकाने दिलेल्या वेळे नुसार मेष ००.०८.०८ लग्न येते हि जी माहिती आपल्याला पुरवण्यात आली निदान ती बरोबर असल्याचा निर्वाळा हा केतू देतोय. होय मंगळ रुलीग मध्ये नाही पण चंद्र १० अंश ८ कला व मंगळ १५ अंश ५९ कला वर समसप्तकात असल्याने दृष्टी संबंधातून रुलिंग मध्ये ओढता येईल. सामना ओपनर ने नाही तर मधल्या फळीने निर्णायक केला तर.

या नंतर हे लग्न घेवून जातकाच्या जीवनातील घडलेल्या घटनांशी पडताळून पहायचे असते ती माहिती आपल्या कडे नाही, त्यामुळे हा टप्पा घेत नाही.

निष्कर्ष :- जातकाने सांगितलेली जन्मवेळ बरोबर आहे म्हणजे जन्मलग्न मेष रास अश्विनी नक्षत्र प्रथम चरणात आहे.