गुरुवार, २४ जानेवारी, २०१९

ओळखा पाहू ? आणि वास्तवातील राधिका, गुरुनाथ. भाग-१.

||श्री||


ओळखा पाहू ? आणि वास्तवातील राधिका, गुरुनाथ.

एका ज्योतिष विषयी अभ्यास ग्रुप वर एक कुटप्रश्न दिला गेला. पती पत्नीची कुंडली जन्मटिपण न देता मोजकीच ग्रह स्थिती दिली गेली व कोणती कुंडली कोणाची हे ओळखायचे होते. ज्योतिषशास्त्री परीक्षेत असा प्रश्न हमखास असतो, पण तेथे पूर्ण कुंडली असते. पूर्ण कुंडली तपासावी लागेल, मला यांव माहिती पाहिजे अन त्यांव माहिती पाहिजे मग पुढे बोलल अस म्हणता येईल पण असाही अभ्यास करायला काय हरकत? इथे भाकीत थोडी करायचे आहे. असो, कुटप्रश्न त्यांच्याच शब्दात प्रथम देतो व पुढे मग तो उकलतो, कसे.




गेल्या महीन्यात माझ्याकडे एका पती-पत्नीच्या वैवाहीक जीवनातल्या समस्यां बद्दल ची केस आली होती. ह्या उभयतांचा विवाह आठ वर्षापूर्वी झाला पण लग्ना नंतर अवघे सहा महीने जोडी एकत्र राहीली त्यानंतर पती नव्या नोकरी निमित्त एकटाच लांब अंतरावरच्या शहरात गेला आणि तिथून तसाच परदेशात !
इकडे पत्नी एकटी राहीली. पती दोन वर्षे परदेशात होता, त्या काळात पत्नीला चांगली नोकरी मिळाली. पती परदेशातून परत आल्या नंतर त्याला दुसर्‍या एका लांबच्या शहरात कामावर रुजू व्हावे लागले , पतीने पत्नीला तिकडे बदली करून घे असे सुचवले खरे पण दुर्दैवाने पत्नीची बदली नवरा आहे त्या गावात होणे अशक्य होते , पत्नी ने पतीलाच बदली करुन घ्यावी असे सुचवले पण तेही शक्य नव्हते. यातून काही मार्ग निघेल या आशेवर जोडी तशीच सक्तीने लादलेल्या विभक्त अवस्थेत वर्ष भर राहीली.
दोघे एकमेकांना ‘बदली होत नसेल तर नोकरी सोडुन दुसरी पहा’ असा आग्रह करु लागले पण हातातली नोकरी सोडायला दोघेही तयार नव्हेत. आता तणाव वाढू लागला, जिव्हाळा आत्मियता कमी होऊ लागली , पूर्वी दर पंधरा दिवसांत भेटणारे हे जोडपे आता तीन तीन महीन्यात एकमेकांचे तोंड देखील पाहात नव्हते , रोज होणारा फोन कॉल आता केव्हातरी , काही काम असेल तरच होऊ लागला.
पुढे नवरोबांच्या आयुष्यात ‘शनाया’ आली ! आणि मग पुढे काय झाले असावे याचा अंदाज आपण बांधू शकता.
असो या दोघांच्या पत्रिका विलक्षण बोलक्या आहेत , जातकाची माहीती उघड करायची नाही म्हणून संपुर्ण पत्रिका मला देता येणार नही , मोजकीच ग्रहस्थिती दाखवतो , बघा ग्रहयोग कशी फळें दाखवतात…
( यातली गुरुनाथची पत्रिका कोणती ?)

भाग १:-



पहिली पत्रिका मिथुन लग्नाची :-
उपलब्ध करून दिलेली ग्रहस्थिती:- चतुर्थात मंगळ, षष्ठात वक्री नेपच्यून, व्ययात शुक्र.
विश्लेषण:- मंगळाची स्थिती दिली आहे त्यामुळे सहाजीकच मंगळ दोषाकडे लक्ष जाते. विवादित असले तरी पारंपारिक नुसार मंगळ दोषाचा समाचार घेवून मग पुढे जातो. दोन्ही कुंडलीत चतुर्थात मंगळ आल्याने वैवाहिक दृष्ट्या दोषदायक स्थानात तो आला. पण दोन्ही कुंडलीत तो प्रचलित नियमा नुसार निर्दोष होतो आहे. तरी या पुराव्या वरून वाटते कि विवाह जमवतांना मंगळाला मंगळ हा विचार केला गेला असावा (कारण काही जन तो निर्दोष होतो असे मानत नाहीत.) व इतर ग्रहस्थिती अभ्यासली गेली नसावी.

मंगळ:- मिथुन लग्नाला मंगळ हा उपचय स्थानांचा स्वामी. शुभ मंगळ हा कर्तृत्व, कार्यतत्पर, कर्म, बाहुबल, पराक्रम, यश यांचा भोक्ता. हा या लग्नाला उपचय स्थानांचा स्वामी असल्याने उपजतच कर्माला महत्व देण्याची वृत्ती असते. त्यात तो चतुर्थात आल्याने त्याची दशम या कर्म, अधिकार, पद, उच्चदर्जा दर्शविणाऱ्या स्थानावर दृष्टी असल्याने या साठी धडपड, श्रम घेणारा आहे. लाभातील स्वराशीवर त्याची दृष्टी त्यामुळे जास्तीत जास्त लाभ, कमाई करणे हे माझे जन्मसिध्द उद्दिष्ट आहे व ते मी साध्य करून दाखवणारच हा आक्रमकपणा, त्या प्रती समर्पनता दिसणार. चतुर्थ या मातृभूमी स्थानात तो स्थानापन्न झाला असल्याने हे सर्व करण्यासाठी त्याला देशाटन करण्याची आवश्यकता वाटणार नाही. या कुंडलीत त्याचा व्ययाशी संबंध येत नाही, नक्षत्रानेही. (अरेरे, सर तुम्ही मर्यादित माहितीचा खटका पाडून अभ्यासाचे इंजिन पारंपारिक लोहमार्गावर वळविले. उपनक्षत्र, उपउपनक्षत्र स्टेशनांना तुम्ही फाटा दिला.) तर हा मंगळ आपली जागा सोडायला तयार होणाऱ्यातला काही वाटत नाही, निदान दुसऱ्याच्या सांगण्यावरून तरी. ह्या मंगळाची सप्तमावर दृष्टी त्यामुळे वैवाहिक जोडीदाराला हा जुमानणार नाही, हुकमाचा ताबेदार होणार नाही. त्याच्या सूचनांचे पालन करण्या ऐवजी “मग तूच का हे करत नाही” असे फर्मान सोडणारा. येथील मंगळ सबंध वैवाहिक जीवनात कलह निर्माण करणारा, विरह, विभक्तता देणारा. वरील सर्व कारकत्व पाहता वैवाहिक जीवनात नोकरी बदलीत आत्मसन्मानाचा मुद्दा कलहाचे कारण याच मंगळा मुळे आहे. सप्तमेश गुरु व मंगळ यांच्या संबंधावर हे ठरेल कि तह करणार कि बचेंगे तो और भी लडेंगे, तसेच बुधाचा सप्तमाशी संबंधावरही.

नेपच्यून:- जलतत्वाचा हा ग्रह गूढ, विचार, विकारांच्या लहरी, अगम्य, सामान्यरेषेच्या वरची फले देणारा. जलतत्वाच्या राशीत असल्याने राशीबली. वृश्चीकेचे जलतत्व हे प्रवाही नाही तर साचलेले आहे. त्यात हा मंदगती ग्रह षष्ठ या नोकरीदर्शक स्थानात त्यामुळे नेपच्यून येथे शनि सारखी फळे देणार. त्यात हा नेपच्यून वक्री, हे हि बल त्याला प्राप्त. त्यामुळे हा नेपच्यून नकारात्मक फले देवू शकतो. पण बालावास्थेतील हा वरूण कुणाच्यातरी प्रभावाखाली त्याची फलाची दिशा ठरवणार. उपलब्ध कुंडली नुसार दोघांचा प्रभाव आपणास तपासता येईल. एकतर त्यावर दिप्तांश मर्येदेत दृष्टी ठेवणारा प्रतियोगातील शुक्र व दुसरा त्याचा स्वामी मंगळ. शुक्रामुळे तो वैवाहिक सुखात, शैयासुखात बाधा उत्पन्न करणार तर मंगळामुळे नोकरी, व्यवसाया वर प्रभाव टाकणार. ‘खालच्या पातळीवर शुक्र जे काम करतो तेच काम नेपच्यून वरच्या पातळीवर करतो.’ असे कुंडलीची भाषा खंड-२ मध्ये विधान केले आहे.

शुक्र:- शुक्राला फक्त सप्तमभावाचे नैसर्गिक कारकत्व आहे. मिथून लग्नाल तो पंचम व व्यय भावाचा मालक होतो. पंचम स्थान प्रेम, प्रणय, कला, मनोरंजन तर व्यय स्थान भोगभाग्य हे तर मुळात शुक्राचे प्रांत, आणि शुक्राला येथे त्याचीच मालकी मिळाली. त्यात लग्नेश बुध नैसर्गिक मित्र. म्हणजे शुक्र खर तर खुशीत हवा व त्याने भरभरून फले द्यायला हवे. विचाराधीन कुंडलीत तर त्याने मेहेरनजर करायला हवी होती. “इतक मेहेरबान होण्यासारखे आहे काय?” म्हणताय. सायबानु शुक्र व्ययात स्वराशीत आहे. “आहे, मग त्याने काय झाले?” विमला योग झालाना महाराज. हा विमला योग काही पापग्रहाने झालेला नाही तर शुभग्रहाने झालेला हाये. सुख, ऐश्वर्य, विलास, सौभाग्य, भोगभाग्य देणाऱ्या शुक्राने तो केलाय. “राजे, तुम्ही एवढे म्हणताय तर या शुक्राला अडवलं कुणी, का दिली नाही भरभरून फळे?” आडवल! आहो हा शुक्र धाकात आहे. वरती नेपच्यून चे विश्लेषणात लीवलना ते.  आता अजून कुणाचा धाक आहे, विशेषता शनि महाराज डोळे रोखून आहेत का? हे काही आपल्याला उपलब्ध कुंडली वरून समजणार नाही. असू द्या. शुक्रही बाल्यावस्थेत आहे तो धाकात राहणार. निदान नेपच्युनचा तरी प्रभाव माहित असणे आपल्याला पुरेसे आहे. शुक्र नेपच्यून प्रतियोग, केंद्रयोग हा काही शुभ योग नाही. व्यय (परदेश, त्याग, बंधने) व षष्ठ (नोकरी, जोडीदारचे व्यय) ह्या स्थानातून तो होत असल्याने या बाबतीत नेपच्यूनच्या वृत्ती नुसार सामान्य स्ताराच्या वर त्याने नकारात्मक फले वैवाहिक सुखाच्या बाबतीत दिली. विमलायोग पावित्र्य, शुध्दता, शुचिर्भूतताही देतो.

निष्कर्ष :- वरील देशाटनाला अनास्था दाखवणारा मंगळ व नेपच्यून, शुक्राचा मूड पाहता विशेषत: शुक्र विवेचनातील शेवटची ओळ लक्षात घेता मी या निष्कर्षाप्रत आलोय की मिथुनलग्नाची हि कुंडली राधीकावहीनींची आहे. 


तळटिप:- कोणती कुंडली कोणाची याचा सोक्षमोक्ष येत्या रविवारी लागणार आहे.


पुढील लेख:- राष्ट्रशल्य

गुरुवार, १७ जानेवारी, २०१९

विवाह केव्हा?-१

|| श्री||



विवाह केव्हा?-१.



जातकाची ओळख पटणार नाही याची शक्य तेवढी काळजी घेत आहे. जातकाचे नाव, फार वैयक्तिक, गोपनीय माहिती देत नाहीये. कुंडली मांडता यावी म्हणून जन्मटिपण देत आहे.

जाताक:- पुरुष. जन्म ता:- १५/९/१९८०, जन्म वेळ:- पहाटे २:३२, जन्म स्थान:- अक्षांश २३/१९ उत्तर, रेखांश ७३/०१ पूर्व. वडोदरा,गुज.
जातक माझ्या मित्र परिवारातला आहे. प्रश्न नेहमीचाच, सर्वांच्या सरावाचा. विवाह योग केव्हा? मी हा प्रश्न १९/०७/२०१४ रोजी १८:४४ ला नाशिक (२०/०२/२३ उ, ७३/४८/१० पु) येथे सोडवला होता. पण प्रश्न कुंडली वरून नव्हे तर जन्मकुंडली वरून. 




== ही पत्रिका मी १९/७/२०१४ रोजी सायं. ६:४४ ला म्हसरूळ, नासिक मुक्कामी सोडवली होती हे आधी नमूद केले आहेच. या वेळेच्या शासकग्रहांचा उपयोग मी जन्मवेळ शुद्धी करणा साठी व कालनिर्णया साठी केला बाकी जन्मकुंडली वरून मी प्रश्नाचे उत्तर काढले होते. पार्श्वभूमी अशी कि मी माझ्या एका मित्राच्या ऑफिसात गेलो असता तेथे त्याचा दुसरा एक मित्र बसलेला होता, गप्पा हाणत. सावळारंग असला तरी जातक दिसायला तरणाबांड (हॅडसम हो, ते जे प्रतीकात्मक चित्र दिले आहे ना, त्यातील वराला सावळारंग दिला कि तसा.), व्यवस्थित शिक्षण, नोकरीही बऱ्यापैकी, घराची परिस्थितीही तशी चांगली. तरीही लग्नाला उशीर होत होता त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधलेले हे महाशय बेचैन झाले होते, असे त्यांच्या गप्पातून जाणवत होते. या पूर्वीही तेथे आमची भेट झालेली असल्याने आमचीही ओळख झालेली होती. “अरे येडया कसले पसंतीचे कार्यक्रम करत बसतो, मी सांगतो तुला एखादी पोरागी पटव.” इती माझा मित्र. माझ्या कडे वळून “मी याची कुंडली पाहिली, मी सांगतो याला प्रेमविवाहाचे योग आहेत. हि आईला पसंत नाही, ती बहिणीला पसंत नाही, तर कधी बाप म्हणतो आपल्या तोलाचे नाही असे रडत बसतो.” माझा हा मित्र ज्योतिषाचा हौसी. अस त्याच्या बेचैनीला चाव्या मारायची थट्टा मस्करी चालली होती. मी तुझ्या ऑफिसला येतो एकदा असे जातक म्हणाला व त्या प्रमाणे आला. म्हणजे जातक विषया बाबत गंभीरही होता तर.  

         मित्राने पारंपारिक नुसार त्याची कुंडली तपासली होतीच, घरच्यांनीही कुठे, कुठे दाखवली होतीच. त्यामुळे मी कृष्णमुर्ती पध्दतीने पहावी असे तो म्हणाला. म्हणून मी जन्मटिपणा नुसार कुंडली बनवली. जातकाने दिलेल्या वेळे नुसार पत्रिका संगणकावर प्रगट झाली. प्रश्न विवाहा संबंधी असल्याने सप्तमाचा सब बघितला तो बुध होता. त्या वेळेचे शासक ग्रह L – गु, S – के, R – मं, D- श. यात बुध नव्हता. प्रश्न संबंधी भावाचा सब शासक ग्रहात नसता त्या नुसार जन्मवेळ संशोधीत करण्याची एक प्रथा आहे. गुरु वक्री शनीच्या नक्षत्रात असल्याने तो बाद होतो तर शनी जरी दुसऱ्याच दिवशी मार्गी होणार असला तरी त्या वेळी वक्री असल्याने जन्मवेळ शुध्दीकरणात सब म्हणून तो बाद होईल. शासक ग्रहात शनी असल्याने मंगळाचा विचार न करता बुधाचा पुढचा केतू हा सप्तमाचा सब घेतला व त्यानुसार जन्मवेळ पहाटे २:३७:२७ अशी घेतली व शिरसत्या प्रमाणे जातकास काही प्रश्न विचारून या जन्मवेळेची कुंडली बनवून कार्येश ग्रह काढले. जातकाचे तीन प्रश्न होते.
१) विवाह होणार आहे का? २) होणार असल्यास पारंपारिक विवाह कि प्रेमविवाह? ३) विवाह केव्हा? 



१)    सप्तमाचा सब केतू ७ व पूरक ५,८ भावांचा कार्येश असल्याने विवाह होईल. शनी तृतीयात असता विवाहास विलंब होतो. प्रश्न वेळी जातकाचे वय ३३ पूर्ण होते, म्हणजे तसा उशीर झालाच होता. जातकाचे म्हणणे होते आजून किती उशीर. लग्न होते कि नाही? त्यामुळे तुझा विवाह होईल असे म्हटल्यावर जरा खुलला. सप्तमाचा सब विरोधी स्थानांबरोबर, शनी, राहू, केतू व वंध्याराशी संबंधित असता विवाह होत नाही असे सांगितले जाते. ह्या कुंडलीत संशोधित सब केतू व्यंध्याराशीत आहे. जातकाने दिलेल्या वेळे नुसार सब बुध हाही व्यंध्याराशीत आहे. शनी सब घेतला तरी तोही व्यंध्याराशीत आहे. आपण घेतलेला सब केतू विवाहास आवश्यक भावांचा कार्येश आहे त्यामुळे विवाह होईल. तसे तर बुध व शनीही कार्येश होतात. बुध शनी युक्त, केतू शनीच्या राशीत त्यामुळे विलंब हे फळ मिळणारच होते, तिघांपैकी कोणीही सब असला तरी. 
२)    जातकाचा दुसरा प्रश्न हा मित्राने त्याला प्रेमविवाह होईल असे सांगितल्या मुळे होता. मित्राने पारंपारिक नुसार सांगितले होते. आपण आता केपी नुसार विचार करत आहोत. के.पी.चा या बाबत नियम असा कि पंचमाचा सब सप्तमाचा व सप्तमाचा सब पंचमाचा कार्येश असता प्रेमविवाह होतो. सप्तमाचा सब पंचमाचा कार्येश आहे पण पंचमाचा सब सप्तमाचा कार्येश होत नाही. त्या मुळे प्रेम विवाह नाही.
३)    प्रश्न समयी जातकाला बुधाची महादशा चालू होती. बुध रुलिंग मध्ये नाही. बुध महादशा ४२ पर्यंत आहे मग त्या नंतर विवाह होणार कि काय? हे सांगण्यापूर्वी अजून चाचपणी करणे गरजेचे आहे. अश्या वेळी एक सोय करून ठेवलेली आहे ती म्हणजे या क्लासिक रुलिंग प्लॅनेट बरोबर काही ग्रह स्वीकृत करण्याची मुभा. मी हे कार्ड वापरायचा निर्णय घेतला. प्रश्न समयी धनु लग्न होते व बुध सप्तमात असल्याने त्याची प्रश्नलग्नावर दृष्टी होती. बुध चवथ्या पायरीवर व्दितीयाचा कार्येश होतो त्या मुळे त्याची महादशा विवाहास अनुकूल आहे.
    प्रश्नसमयी अंतर्दशानाथ मंगळ शासक ग्रहात होता व मंगळ व्दितीयाचा कार्येश असल्याने विवाहास अनुकूल होता. एक दिवस आगोदरच शनी विदशा चालू झाली होती. शनी रुलिंग मध्ये आहे व तो व्दितीयाचा कार्येशही आहे तसेच दुसऱ्या दिवशीच तो मार्गी होणार होता. जवळ जवळ अजून दोन महिने त्याची विदशा भोग्य होती म्हणजे अगदी लग्न झाले जरी नाही तरी लग्न ठरण्यास वाव होता, हे शक्य होते. मी जातकास जर असे सांगितले असते कि येत्या दोन महिन्यात तुझे लग्न ठरणार, बघ तू नक्की पेढ्याचा पुडा घेवून मला सांगायला येणार,  तर त्तक्षणी माझ्या तोंडात बोलाचीच साखर टाकून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला हा जातक वाजंत्री वाजवायला लागला असता.



तीन कारणांमुळे मी शनी विदशा निवडली नाही. पहिले कारण म्हणजे रुलिंग मध्ये शनी असल्याने तो अजूनही विवाहास विलंब असल्याचे खुणावत होता. दुसरे म्हणजे विवाहास अनुकूल २,७,११ भावांपैकी केवळ व्दितीय भावच कार्यान्वित होत होता. शासकग्रहाधारीत कालनिर्णय करतांना अशी लिंक मिळालीच नाही तर नाईलाज असतो पण इथे ते शक्य होते. लाभाची लिंक मिळत नसली तरी सप्तम या प्रमुख भावाची लिंक उपलब्ध होती. केतू ती कडी साखळीत गुंफत होता. तिसरे कारण म्हणजे एक दिवसा साठी का होईना शनी वक्री असून त्याच्या नक्षत्रातील गुरुही रुलिंग मध्ये असल्याने मी त्याची विदशा सोडायचे ठरवले. बुध महादशेत मंगळ अंतर्दशेत केतू विदशेत ४ नोव्हें. ते २५ नोव्हें. २०१४ दरम्यान विवाह संभव असे त्याला मी सांगितले. तरीही चार महिने म्हणजे विलंब नसल्याने तो खुश झाला. शासकग्रहांचा आधार घेत असल्याने गोचर पहायची जेहमत काही मी घेतली नाही.   
         
          एवढे करूनही अंदाज चुकला. प्रत्येकवेळा तो बरोबरच यावा अस काही नसत. माता पार्वतीचा शाप आहे तो ज्योतिषाला कधी कधी अनुभवाला येतोच. तरीही बरोबर आल्याचा आनंद असतोच ना. सप्टें.२०१५ च्या १ तारखेला मित्राच फोन आला. अरे आपण त्या ‘अबकड’ ची पत्रिका पाहिली होतीना, त्याचे लग्न ठरले. २५ डिसें.२०१५ विवाह तारीख ठरली. विवाह पारंपारिक होता. म्हणजे दोन प्रश्नांची उत्तरे बरोबर आलीत. आपण काढलेल्या अंदाजापेक्षा तब्बल एक वर्ष एक महिना उशिरा विवाह होतो आहे. संभाव्य कालावधीत जातकाचे लग्न सुध्दा ठरले नाही. प्रश्नाची फलश्रूती समजली होती त्यामुळे सहाजीकच त्याची समीक्षा केली तर मी अधिक बुचकळ्यात पडलो. बुध दशा राहू भुक्ती शनी विदशेत विवाह होतोय. बुध शनी चे ठीक आहे ते रुलिंग मध्ये होते. प्रश्नलग्ना पासून दूर असलेला हा राहू ना शासकग्रहांच्या युतीत ना दृष्टीत. त्याला रुलिंग मध्ये घ्यावा तर घ्यावा कसा? एवढच नाही तर हा राहू विवाहास अनुकूल ना मुख्य ना पूरक भावांचा कार्येश. किती म्हणजे किती अधिग्रहण करावे या राहुने? ज्याने देवाधीकांच्या डोळ्यात लीलया धूळ फेकून अमृतपान केले त्याच्या समोर माझ्या सारख्या भोळ्या भाबडया पामर मानवाचे काय, नाही का?


पुढील लेख लवकरच......

गुरुवार, १० जानेवारी, २०१९

ब्रम्हचर्येचे योग - २

||श्री||




ब्रम्हचर्येचे योग - २



            नमस्कार मागील लेखात आपण एका साध्वीची कुंडली पाहिली. हि कुंडली एका ब्रम्हचारी जातकाची आहे जी मागच्या पोष्ट मध्ये दिली आहे. एक व्रत म्हणून ते स्वेच्छेने पालन करणारी परंतु नोकरी व्यवसाय करून रूढ अर्थाने सन्यास न घेता अध्यात्मकार्यातही सहभाग घेणारी, साधना करणारी अशी व्यक्ती आहे. पुढे पूर्णवेळ हेच कार्य करण्याचा जातकाचा मानस आहे. जातकाची हि इच्छा पूर्ण होईल का नाही हे सांगाता येईल. पारंपारिक मध्ये तशी चर्चा होते. ह्या कुंडलीचे विश्लेषण के.पी. पध्दतीने करावे असे वाटले. पण के.पी. मध्ये या संबंधाने नियम माझ्या वाचनात नाही कि अमुक स्थानाचा सब अमुक भावांचा कार्येश असता अमुक भावांच्या कार्येश ग्रहांच्या दशा अंतर्दशेत जातक सर्वसंग परित्याग करतो, सन्यास घेतो, हिमालयाची वाट धरतो, अध्यात्मकार्याला वाहून घेतो इ.इ. के.पी. मध्ये विवाह, वैवाहिक आयुष्या बाबतच जास्त विचारल, बोलल, लिहिल जात.  सध्या जातक ४२ वर्षांचा आहे व अजून अविवाहीत आहे. म्हणून मग के.पी. प्रमाणे जातकाचा सप्तमाचा सब विवाहास अनुकूल नाही का? असेल तर आत्ता पर्यंत दशागोचर अनुकूल आल्या नाहीत का? हे तरी निदान पहावे असे ठरवले. 


१) पुरुष:- ३०/८/१९७६, पहाटे ३:४०, अक्षांश २२°१२' उत्तर, रेखांश ७१°४०' पुर्व.





          सप्तमाचा सब बुध आहे. बुधाचे चौपदरी कार्येशत्व पाहिल्यास तो विवाहास अनुकूल अथवा प्रतिकूल दोन्ही स्थानांचा कार्येश होत नाही. पण चतुर्थ स्थानाचा तो कार्येश आहे व चतुर्थ स्थान हे आता प्रबळ विवाह विरोधी स्थान मानले जावू लागले आहे, या योगावर अविवाहीत रहावे लागते. पण (परत पण आलाच, बर झाल आला. मला वाटल कि हा विषय इथच संपवावा लागतो कि काय. काही लिहिल्या सारख वाटलच नाही. हा पण अजून चार दोन ओळी लिहिल्याचे समाधान तरी देईल.) तर पण हा बुध तृतीयाचाही कार्येश आहे. तृतीय स्थान हे करारनाम्याचे स्थान आहे. Register Marrage साठी विचारात घेतात. ते contract marrage  साठी हे आता विचारात घेतले जावू लागलेय. हा मुद्दा पुढचा, मुळात विवाहयोग असेल तर तो देवाब्राह्मणांच्या साक्षीने कि सरकारी अधिकाऱ्यांच्या साक्षीने की सगेसोयऱ्यांच्या साक्षीने होणार ते पहायचे.




             तर सप्तमाचा सब विवाहासाठी हात वर करून मोकळा झाला आहे. आपल्याला हे कार्य काही जमणार नाही बुवा, दशानाथांनो तुमचे तुम्ही काय ते बघून घ्या. सब ने हात वर केल्यावर दशानाथही हात काढून घेतात. जातकाला २१ वर्षे पूर्ण झाल्यावर गुरु महादशेतील मंगळ व राहू अंतर्दशा भोग्य होती. गुरु विवाहास आवश्यक २,७,११ भावांचा कार्येश आहे. पंचम या पूरक भाव व गुरु दृष्टीच्या बळावर अंतर्दशानाथ मंगळाने अविचार केला असता एखादवेळे. चालू दशानाथ शनीचा सप्तमावर प्रभाव पहाता या मंगळाच्या उतावीळपणाला त्याने आवर घालून आपल्या दशेत शुक्र अंतर्दशेत गुरु विदशेत २,७,११ भावांची साखळी जुळवत वयाच्या ३४ व्या वर्षी जातकाला बंधनात अडकवला असता, जर सबने हात दिला असता तर. सप्तमाच्या या सबने जातकाची जन्मवेळ शुध्दीकरणाची आवश्यकता नाही हे निदान सध्यातरी सिध्द केले. कारण आज पर्यंत जातकाने विवाह केला नसला व आजन्म ब्रम्हचर्य पालनाचे व्रत घेतले असले तरी पुढेही तो ते पालन करेल या विषयी लोक शंका उत्तपन्न करणार, ज्योतिषी ही, कारण तृतीयातील मंगल शुक्र संबंध. पण मंगळ या शुक्राच्या नव्हे तर बुधाच्या अंशात्मक युतीत आहे हे लक्षात घ्या. असो.  




          गुरुवर्य श्री.कृष्णमुर्तीच्या निर्देशानुसार कार्यशत्व विचारत घेवून जर पाहिले तर? सब बुध ३,१२ न.स्वा.चं ४,१ सब चंद्रच आहे. म्हणजे तरीही विवाह विरोधी भावांचा कार्येश आहे. या बुधावर गुरु व शनीची दृष्टी असल्याने तो ११ व ७ या भावांचा कार्येश होतो पण हे कार्यशत्व दुय्यम मानले जाते, काय वाटते तुम्हाला?


शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

ब्रम्हचर्याचे योग

|| श्री ||

मागील लेख:- काळवेळेचे गणित चुकते कसे? १/५.


ब्रम्हचर्य चे योग

            एका ग्रुपवर मागे साधारण वर्षा पूर्वी ब्रम्हचारीच्या पत्रिकेतील योगा विषयी विचारणा झाली होती. त्या वेळी मी माझ्या संग्राहातील सहा कुंडल्या दिल्या होत्या. आपेक्षा होती कि एक एक कुंडलीचे वेगवेगळ्या ज्योतिर्विदांनी विश्लेषण करावे. त्यात एक साध्वीची कुंडली होती जिचे मी विश्लेषण केले होते, पण इतर कुणी विश्लेषण करायला प्रतिसाद दिला नाही असो. ते ब्लॉगवर देण्या सारखे वाटले म्हणून लेख स्वरूपात देत आहे. तेव्हा नसेल जमले निदान आता ब्लॉगवर तरी आपले मत मांडतील हि आशाही आहेच. ग्रुप वरील इथे देत आहे. कुंडली पेक्षा जन्म टिपन दिले म्हणजे आपल्या पद्धतीने कुंडली बनवने श्रेयस्कर जाते. मी स्वतः नंबर ६ च्या जातकाच्या कुंडलीचे विषया संबंधी विश्लेषण केले आहे. 



१) पुरुष:- ३०/८/१९७६, ३:४०, अक्षांश २२°१२' उत्तर, रेखांश ७१°४०' पुर्व.


२) पुरुष:- १७/९/१९५१, ६:००, अक्षांश १८°४४' उत्तर, रेखांश ७३°३९' पुर्व.

३) पुरुष:- ११/५/१९७३, ६:००, अक्षांश २०°१३' उत्तर, रेखांश ७३°५८' पुर्व.

  ४) पुरुष:- २९/१०/१९७१, २२:४५,अक्षांश २१°१०' उत्तर, रेखांश ७५°४२' पुर्व.

 ५) पुरुष:- १९/३/१९७०, २१:२०, अक्षांश २४°१२' उत्तर, रेखांश ७२°२४' पुर्व.

 ६) साध्वी:- ८/४/१९६३, १३:००, अक्षांश १९°०४' उत्तर, रेखांश ७२°५२' पुर्व.

          नंबर ६ :- स्त्री जातकाची कुंडली. लग्न कर्केत ३°१८'१८"  असल्याने वर्गोत्तम. अयनांश फरकाने लग्नाची वर्गोत्तमता हिरावली जावू शकते. आत्मा कारक रवी भाग्यात. भावमध्य चलीतात तो दशमात जातो तर भावारंभी चलीतात तो नवमातच आहे. रविचा विचार या साठी की तो नैसर्गिक आत्माकारक आहे हे सर्वांनाच माहिती आहे, पण तो शिवभक्ती, मानसिक शुद्धता, उत्तम गुण व निती, शुद्ध सात्वीक आचार विचार, साक्षात्कार यांचाही कारक आहे. स्वेच्छा ब्रहाचर्ये साठी तो महत्वाचा कारण यात आत्मशक्तीची ही परिक्षा असते. येथे तो नवमात आणि तेही गुरूच्या राशीत गुरू युक्त आहे. बुधाच्या नक्षत्रातील हा रवी कुंभ नवमांशी असल्याने त्याचे महत्व जाणकारास सांगणे नलगे आणि चंद्राचा तो व्ययेश असल्याने त्यागा साठी मानसिक बळ देणारा.
               

               रवि हा आत्मतेज देणारा तर आत्मसंयम देणारा शनी. कठोर अनुशासन, इंद्रियनिग्रह, स्वार्थत्याग, हठयोग,सहनशीलता, चिकाटी, दृढनिश्चय हे ब्रह्मचारीस आवश्य गुणांचा दाता शुभ शनि. विचाराधीन कुंडलीत शनी शशयोगात असल्याने शुभ दाता. भावमध्य चलीत घेणाऱ्यांना मात्र शशयोगाचा विचार सोडावा लागेल, पण त्यांनी निराश व्हायचे कारण नाही कारण शनी त्यांना गुढाचे आकर्षण देणार शिवाय इंद्रियनिग्राहासाठी तेथेही उपयुक्त.

              कुणी म्हणेल गुरूजी पण सप्तमेश सप्तमात लग्नेशाशी नवपंचम योगात, लग्नेशाच्या सप्तमात पतिकारक रवि, गुरू मग उशिरा का होईना विवाह व्हायला हवा की नाही ? तर ही कुंडली Made for each other ची तसुभरही नाही की काय असे वाटण्याची आहे. जणू ईश्वाराने जातकाशी करार करून जामिनावर जमिनीवर सोडलय आणि भुलोकी आल्यावर आंतर्लोकीय कराराचा भंग करू नये म्हणून गाठ बांधायचे उपरणच तयार केले नाही की काय असा ब्रह्मदेवावर आक्षेप घेता येण्यासाठी सबळ पुरावा कुंडलीत मिळतो. हा पुरावा म्हणजे केतु. सप्तम भावारंभी असलेला हा केतू. आता भावमध्य चलितावाले एक भुवई उंचावून भावारंभ चलित वाल्यांच्या डोळयाला डोळा भिडवत असले तरी भावारंभवाल्यांनी चुकचुकल्यासारखे मुळी वाटून घेवू नये. काय ये ना हा केतू भावारंभ चलितात षष्ठात विराजमान झाला पण तो सप्तम भावारंभी आहेच. केतू हा मोक्ष कारक त्यामुळे गुरू,रवि,शनि पेक्षाही या क्षेत्रात त्याचा वकुब मोठा. केतू हा विरक्ती, तपाचरण, जपजाप्य यांचा कारक तर आहेच पण तो 'ना रहेगी बांस ना बजेगी बासुरी' या मताचा असल्याने अभाव निर्माण करणाराही आहे.

                 गुरू वेदांत, तत्वज्ञान, मिमांसा, धार्मिक कृत्ये, निस्पृहता, निष्काम भक्ती, ज्ञान यांचा कारक. गुरू ने या कुंडलीत एकमताने आपले कार्येशत्व अनुभवास दिले. भावमध्य व भावारंभ दोन्ही चलितात तो नवमातच आहे. धर्मेश धर्मात असता बाकी काही सांगावयास नको. शनि, गुरू दोघेही बुधाच्या (व्ययेशाच्या) नवमांशात आहेत. गुरू स्थाननाश करतो या विधानाचाही प्रत्यय येतो. जरी त्या अध्यात्मात कार्यरत असल्या तरी किर्ती, नावलौकीक फारसा नाही.

              मोक्षत्रिकोणातील व्ययस्थानाचा स्वामी बुध दशमात आल्याने आध्यत्मक्षेत्र हेच कर्मक्षेत्र झाले. नवमांशात लग्नेश व्ययेश युती लाभात येतेय. मोक्ष त्रिकोणातील चतुर्थात नेपच्युन व चतुर्थेश अष्टमात मोक्ष त्रिकोण बलवान करत असले तरी भावमध्य चलितात ते पंचम आणि नवमात गेल्याने धर्म त्रिकोण बलवान करतात. प्रस्तुत कुंडलीत एक गोष्ट जाणवते ती म्हणजे भावमध्य व भावारंभ चलितात काही ग्रहांचे स्थानभिन्नत्व येत असले तरी ज्या विषया संबंधीत चर्चा करतोय त्याची शेड फक्त बदलली जातेय. तसेही नवमातील रवि, गुरू मुळे धर्मत्रिकोण बलवान होतोय.

आपली ज्योतिषदृष्टीकोनातून मते नोंदवल्यास मला आनंद वाटेल. धन्यवाद.