शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

ब्रम्हचर्याचे योग

|| श्री ||

मागील लेख:- काळवेळेचे गणित चुकते कसे? १/५.


ब्रम्हचर्य चे योग

            एका ग्रुपवर मागे साधारण वर्षा पूर्वी ब्रम्हचारीच्या पत्रिकेतील योगा विषयी विचारणा झाली होती. त्या वेळी मी माझ्या संग्राहातील सहा कुंडल्या दिल्या होत्या. आपेक्षा होती कि एक एक कुंडलीचे वेगवेगळ्या ज्योतिर्विदांनी विश्लेषण करावे. त्यात एक साध्वीची कुंडली होती जिचे मी विश्लेषण केले होते, पण इतर कुणी विश्लेषण करायला प्रतिसाद दिला नाही असो. ते ब्लॉगवर देण्या सारखे वाटले म्हणून लेख स्वरूपात देत आहे. तेव्हा नसेल जमले निदान आता ब्लॉगवर तरी आपले मत मांडतील हि आशाही आहेच. ग्रुप वरील इथे देत आहे. कुंडली पेक्षा जन्म टिपन दिले म्हणजे आपल्या पद्धतीने कुंडली बनवने श्रेयस्कर जाते. मी स्वतः नंबर ६ च्या जातकाच्या कुंडलीचे विषया संबंधी विश्लेषण केले आहे. 



१) पुरुष:- ३०/८/१९७६, ३:४०, अक्षांश २२°१२' उत्तर, रेखांश ७१°४०' पुर्व.


२) पुरुष:- १७/९/१९५१, ६:००, अक्षांश १८°४४' उत्तर, रेखांश ७३°३९' पुर्व.

३) पुरुष:- ११/५/१९७३, ६:००, अक्षांश २०°१३' उत्तर, रेखांश ७३°५८' पुर्व.

  ४) पुरुष:- २९/१०/१९७१, २२:४५,अक्षांश २१°१०' उत्तर, रेखांश ७५°४२' पुर्व.

 ५) पुरुष:- १९/३/१९७०, २१:२०, अक्षांश २४°१२' उत्तर, रेखांश ७२°२४' पुर्व.

 ६) साध्वी:- ८/४/१९६३, १३:००, अक्षांश १९°०४' उत्तर, रेखांश ७२°५२' पुर्व.

          नंबर ६ :- स्त्री जातकाची कुंडली. लग्न कर्केत ३°१८'१८"  असल्याने वर्गोत्तम. अयनांश फरकाने लग्नाची वर्गोत्तमता हिरावली जावू शकते. आत्मा कारक रवी भाग्यात. भावमध्य चलीतात तो दशमात जातो तर भावारंभी चलीतात तो नवमातच आहे. रविचा विचार या साठी की तो नैसर्गिक आत्माकारक आहे हे सर्वांनाच माहिती आहे, पण तो शिवभक्ती, मानसिक शुद्धता, उत्तम गुण व निती, शुद्ध सात्वीक आचार विचार, साक्षात्कार यांचाही कारक आहे. स्वेच्छा ब्रहाचर्ये साठी तो महत्वाचा कारण यात आत्मशक्तीची ही परिक्षा असते. येथे तो नवमात आणि तेही गुरूच्या राशीत गुरू युक्त आहे. बुधाच्या नक्षत्रातील हा रवी कुंभ नवमांशी असल्याने त्याचे महत्व जाणकारास सांगणे नलगे आणि चंद्राचा तो व्ययेश असल्याने त्यागा साठी मानसिक बळ देणारा.
               

               रवि हा आत्मतेज देणारा तर आत्मसंयम देणारा शनी. कठोर अनुशासन, इंद्रियनिग्रह, स्वार्थत्याग, हठयोग,सहनशीलता, चिकाटी, दृढनिश्चय हे ब्रह्मचारीस आवश्य गुणांचा दाता शुभ शनि. विचाराधीन कुंडलीत शनी शशयोगात असल्याने शुभ दाता. भावमध्य चलीत घेणाऱ्यांना मात्र शशयोगाचा विचार सोडावा लागेल, पण त्यांनी निराश व्हायचे कारण नाही कारण शनी त्यांना गुढाचे आकर्षण देणार शिवाय इंद्रियनिग्राहासाठी तेथेही उपयुक्त.

              कुणी म्हणेल गुरूजी पण सप्तमेश सप्तमात लग्नेशाशी नवपंचम योगात, लग्नेशाच्या सप्तमात पतिकारक रवि, गुरू मग उशिरा का होईना विवाह व्हायला हवा की नाही ? तर ही कुंडली Made for each other ची तसुभरही नाही की काय असे वाटण्याची आहे. जणू ईश्वाराने जातकाशी करार करून जामिनावर जमिनीवर सोडलय आणि भुलोकी आल्यावर आंतर्लोकीय कराराचा भंग करू नये म्हणून गाठ बांधायचे उपरणच तयार केले नाही की काय असा ब्रह्मदेवावर आक्षेप घेता येण्यासाठी सबळ पुरावा कुंडलीत मिळतो. हा पुरावा म्हणजे केतु. सप्तम भावारंभी असलेला हा केतू. आता भावमध्य चलितावाले एक भुवई उंचावून भावारंभ चलित वाल्यांच्या डोळयाला डोळा भिडवत असले तरी भावारंभवाल्यांनी चुकचुकल्यासारखे मुळी वाटून घेवू नये. काय ये ना हा केतू भावारंभ चलितात षष्ठात विराजमान झाला पण तो सप्तम भावारंभी आहेच. केतू हा मोक्ष कारक त्यामुळे गुरू,रवि,शनि पेक्षाही या क्षेत्रात त्याचा वकुब मोठा. केतू हा विरक्ती, तपाचरण, जपजाप्य यांचा कारक तर आहेच पण तो 'ना रहेगी बांस ना बजेगी बासुरी' या मताचा असल्याने अभाव निर्माण करणाराही आहे.

                 गुरू वेदांत, तत्वज्ञान, मिमांसा, धार्मिक कृत्ये, निस्पृहता, निष्काम भक्ती, ज्ञान यांचा कारक. गुरू ने या कुंडलीत एकमताने आपले कार्येशत्व अनुभवास दिले. भावमध्य व भावारंभ दोन्ही चलितात तो नवमातच आहे. धर्मेश धर्मात असता बाकी काही सांगावयास नको. शनि, गुरू दोघेही बुधाच्या (व्ययेशाच्या) नवमांशात आहेत. गुरू स्थाननाश करतो या विधानाचाही प्रत्यय येतो. जरी त्या अध्यात्मात कार्यरत असल्या तरी किर्ती, नावलौकीक फारसा नाही.

              मोक्षत्रिकोणातील व्ययस्थानाचा स्वामी बुध दशमात आल्याने आध्यत्मक्षेत्र हेच कर्मक्षेत्र झाले. नवमांशात लग्नेश व्ययेश युती लाभात येतेय. मोक्ष त्रिकोणातील चतुर्थात नेपच्युन व चतुर्थेश अष्टमात मोक्ष त्रिकोण बलवान करत असले तरी भावमध्य चलितात ते पंचम आणि नवमात गेल्याने धर्म त्रिकोण बलवान करतात. प्रस्तुत कुंडलीत एक गोष्ट जाणवते ती म्हणजे भावमध्य व भावारंभ चलितात काही ग्रहांचे स्थानभिन्नत्व येत असले तरी ज्या विषया संबंधीत चर्चा करतोय त्याची शेड फक्त बदलली जातेय. तसेही नवमातील रवि, गुरू मुळे धर्मत्रिकोण बलवान होतोय.

आपली ज्योतिषदृष्टीकोनातून मते नोंदवल्यास मला आनंद वाटेल. धन्यवाद.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा